संदीप बोडवे (मालवण)
एखाद्या भागाचा विकास कशा पद्धतीने करावा याचे एक धोरण ठरलेले असते. किनारपट्टीवरील तीन तालुक्यांचा पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून करावा, यासाठी तसे धोरण आहे. मागील तेवीस वर्षात असे प्रयत्न सुद्धा झालेत. मासेमारीतील मंदीला पर्याय म्हणून येथील युवकांनी पर्यटनात आपला पर्याय शोधायला सुरुवात सुध्दा केली. परंतु मागील काही वर्षात आपण पर्यटनातील उद्दिष्ट गाठू शकलो का?. आताच्या घडीला इथला पर्यटन व्यवसाय शाश्वत आहे का?. या प्रश्नांच्या मुळाशी गेल्यास याचे उत्तर आपणास ‘नाही’ असेच मिळेल. जर आपण तेवीस वर्षांच्या भल्या मोठ्या कालखंडात पर्यटनातील उद्दिष्ट गाठू शकलो नाही तर आपलं नेमकं चुकलं तरी कुठे? याचाही विचार करण्याची वेळ आता आली आहे. पर्यटनात आपण कुठे होतो. आपली उद्दिष्टे काय आहेत? आणि त्यापूर्ती साठी काय केले पाहिजे याचा परामर्श घेणारा ही लेख माला.
संपन्न जैवविविधते सह विस्तीर्ण किनारपट्टी
121 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला 1999 साली देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले.
सुरुवातीच्या काळात मायनिंग आणि नंतर दुग्ध विकासाच्या माध्यमातून जिल्ह्यात अर्थक्रांती घडविण्याचा प्रयत्न झाला. कोकण रेल्वे आणि मुंबई गोवा महामार्गामुळे वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या वलाटीच्या तालुक्यांना विकासाची दिशा मिळाली. मत्स्य दुष्काळाच्या छायेत असलेल्या देवगड, मालवण, आणि वेंगुर्ला या किनारपट्टीवरील तालुक्यात सागरी पर्यटनाशिवाय पर्याय नसल्याचे जेव्हा शासनाच्या लक्षात आले तेव्हा या तीन तालुक्यांचा पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनातून विकास करावा असे धोरण आखण्यात आले. पुढे विमानतळही उभारला.
मालवण बनले सागरी पर्यटनाचे केंद्र
सुरुवातीला शैक्षणिक सहलींपूरता मर्यादित राहिलेला सिंधुदुर्ग किल्ला पुढील काळात सागरी पर्यटनाचा ब्रँड बनू लागला होता. याच दरम्यान अंदमान मधून सागरी जीवांचा अभ्यासकरून आलेले डॉ. सारंग कुलकर्णी यांची नजर सिंधुदुर्ग किल्ल्या भोवतालच्या समुद्रातील प्रवाळ क्षेत्रावर पडली आणि जिल्ह्याला पर्यटनाचा नवा आयाम मिळाला. डॉ. सारंग कुलकर्णी यांनी स्थानिक युवकांना प्रशिक्षित करत समुद्रातील पाण्याखालाचा स्वर्ग पर्यटकांसाठी खुला केला.
सागरी अभयारण्य ते स्कुबा डायव्हिंग स्पॉट
सिंधुदुर्ग किल्ल्यासभोवतालची महत्वपूर्ण सागरी जैवविविधता लक्षात घेऊन याठिकाणी महाराष्ट्र शासनाने राज्यातील पहिले आणि देशातील तिसऱ्या सागरी अभयारण्याची १९८७ साली घोषणा केली. सागरी अभयारण्याला त्याकाळी मच्छीमारांकडून कमालीचा विरोध झाल्या नंतर शासनाने याभागात थोडे मवाळ धोरण स्वीकारले. परिणामी सागरी अभयारण्याच्या क्षेत्रात आता पर्यटनातील जल क्रीडा, स्कुबा डायव्हिंग बिंनदिल्लकपणे सुरू झालेत. येथील पाण्याखालील जैवविविधता पाहण्यासाठी दरवर्षी लाखो लोक समुद्रात उतरतात. स्थानिकांना रोजिरोटीचे नवे साधन मिळाले असले तरीही, अनिर्बंध पर्यटनामुळे येथील मौल्यवान सागरी संपदा आता धोक्यात आली आहे. भविष्यात हीच सागरी संपदा नष्ट झाली तर पुन्हा एकदा पर्यटन व्यवसायाला ब्रेक लागणार आहे.
त्या दोन घटना ठरल्या धोक्याच्या घंटा
देवबाग येथे समुद्र आणि खाडीच्या संगमावर तयार झालेले त्सुनामी आयलंड हे बेट समुद्री पर्यटनाच्या आकर्षणाचा स्पॉट बनला होता. याठिकाणी दरवर्षी लाखो लोक जलक्रीडा करण्यासाठी भेट देत असत. स्थानिकांना यातून मोठा रोजगारही मिळत होता. मात्र यंदा बदललेल्या सागरी प्रवाहा मुळे हे बेट नष्ट होत चालले आहे. येथे येणारा पर्यटकांचा ओघ थांबला आहे. दुसरी धोक्याची घंटा म्हणजे गोव्यामधून सिंधुदुर्गात स्कुबा डायव्हिंग साठी येणाऱ्या पर्यटकांवर तेथील शासनाने घातलेली बंदी. सिंधुदुर्गात दरदिवशी गोव्यातून शेकडो गाड्या जल पर्यटनासाठी आणि स्कुबा करण्यासाठी मालवणच्या दिशेने यायच्या. पर्यटकांना मालवणकडे आणण्यासाठी एक नेटवर्क कार्यरत होत. याला गोवा शासनाने पद्धतशीरपणे चाप लावल्यामुळे मालवणच्या सागरी पर्यटनावर मोठा परिणाम झाला. दोन घटनांमुळे येथे येणारा पर्यटकांचा ओढा कमालीचा थांबला आहे. पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. होम स्टे, आणि रिसॉर्ट सूनी सुनी पडली आहेत. कोरोणाच्या दोन वर्षानंतर स्थानिक पर्यटन व्यावसायिकांवर पुन्हा एकदा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.