… प्रफुल्ल देसाई.
मालवणचा ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सव मालवण बंदर जेटी समुद्र किनाऱ्यावर आज साजरा झाला. यावर्षी कोरोनाचे सावट नसल्याने या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र आज मालवणात मुसळधार पाऊस आणि वारे वाहत असतानाही आज ३ वाजता पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे रिक्षा व्यावसायिकांच्या सहकार्याने भरड नाका ते बंदर जेटी अशी सुमारे ८० रिक्षांचा समावेश असलेली रिक्षा रॅली काढून रिक्षा व्यावसायिकांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले. यात रिक्षा आकर्षक पद्धतीने सजविण्यात आल्या होत्या. या रॅलीचे उद्घाटन पोलीस निरीक्षक विजय यादव व रिक्षा संघटना अध्यक्ष पपू कद्रेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तर बंदर जेटी येथे रिक्षा व्यवसायिकांच्या वतीने पपू कद्रेकर यांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले. यावेळी पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, तालुकाध्यक्ष अविनाश सामंत, शहराध्यक्ष मंगेश जावकर, शेखर गाड, सुधीर धुरी, मेघा सावंत, अन्वेषा आचरेकर, मिलिंद झाड, राजन परुळेकर, पूजा वेरलकर, श्वेता सावंत, किशोर दाभोळकर, मातृत्व आधारचे संतोष लुडबे, तारकर्ली पर्यटन संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, दादा वेंगुर्लेकर आदी व इतर उपस्थित होते.
आज दुपारी साडेतीन वाजल्यापासून मालवणात पावसाने आणि वाऱ्याने जोरदार हजेरी लावत पुढील दोन -तीन तास आपला जोर कायम ठेवला. मात्र त्यानंतर बंदर जेटीवर हळूहळू गर्दी झाली. मध्ये मध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने नारळ लढविण्याच्या पारंपारीक खेळाला जोर चढला. तर सागराला श्रीफळ अर्पण करण्यासही नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. पावसामुळे शिल्पा खोत व यतीन खोत मित्रमंडळ आयोजित महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा स्थगित करण्यात आली. तसेच कबड्डी व आट्यापाट्या स्पर्धाही रद्द करण्यात आली. तर मालवणी संस्कृती व वारसा मित्रमंडळ आयोजित महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा आणि सतीश आचरेकर मित्रमंडळ आयोजित नारळ लढविणे स्पर्धा पावसातच उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली.