महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाकडून पर्यटन संचालनालयाच्या विभागीय स्तरावर 6 उप संचालकांना व जिल्हा परिषदांच्या 33 मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे, UNWTO सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील सर्व गावांकडून अधिकाधिक सहभाग नोंदविला जावा याची तरतूद करण्याची सूचना देण्यात आली. UNWTO (United Nation World Tourism Organisation) द्वारे Best Tourism Village नामांकनाकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. यंदाच्या नामांकनासाठी prakash.om50@nic.in आणि gargi.mittal@gov.in ईमेल वर 15 मे 2022 पूर्वी अर्ज करावयाचा आहे.
Best Tourism Village नामांकनाकरिता अर्ज करण्याकरिता गावाची पात्रता खालीलप्रमाणे:
- कमी लोकसंख्या घनता व जास्तीत जास्त 15,000 रहिवासी
- पारंपरिक उपक्रम- शेती, जंगल, पशु पालन किंवा मासेमारी
- सांस्कृतिक व सामाजिक देवाणघेवाण
UNWTO ने नमूद केलेल्या तीनपैकी कोणत्याही श्रेणीमध्ये गावे अर्ज करू शकतात:
- सर्वोत्तम पर्यटन गावे
- अपग्रेड प्रोग्राम
- सर्वोत्तम पर्यटन गावांचे नेटवर्क
ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जांचे UNWTO च्या सल्लागार मंडळामार्फत खालील मुद्यांच्या आधारे मुल्यांकन केले जाईल.
- नैसर्गिक व सांस्कृतिक संसाधनांची राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर ओळख
- सांस्कृतिक संसाधनाचे जतन व प्रसिद्धी करिता उपाययोजना
- आर्थिक, सामाजिक, पर्यावरण शाश्वतता
- पर्यटन विकास उपाययोजना
- सुशासन व पायाभूत सुविधा
- पर्यटनाचे प्रशासन आणि प्राधान्य
- आरोग्य आणि सुरक्षा
पर्यटन संचालनालयाचे संचालक श्री मिलिंद बोरीकर यांनी सांगितले कि, “प्रत्येक गावात ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता मदत करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर अधिकारी/कर्मचारी यांची नेमणुक करण्याची आम्ही सूचना दिली आहे. सन 2021 मध्ये तेलंगणा राज्यातील पोचमपल्ली या गावास सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटनाचे नामांकन देण्यात आले होते. यंदा या मानाच्या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गावांनी अर्ज करावे यासाठी आमचा हा प्रयत्न आहे.”
आपणही जर आपल्या गावाचे नाव या नामांकनासाठी देऊ इच्छित असाल तर www.unwto.org/tourism-villages या वेबसाईटला भेट द्या व आपल्या गावातील पंचायत सदस्यांपर्यंत ही माहिती आवर्जून पोहचवा.
अर्ज थेट UNWTO कडे न पाठवता केवळ prakash.om50@nic.in आणि gargi.mittal@gov.in वर पाठवले जावेत याची नोंद घ्यावी.